सोमवार, १० ऑगस्ट, २०२०

मुखवटा घातलेला माणूस

सहा बाय आठ ची खोली.त्यात  इन मिन तीन माणसं पाय दुमडून कसबस ऍडजस्ट होतात.चौथ्या माणसाला बाहेर कुठेतरी अंथरून घालावं लागतं, हक्काच घर म्हणून काकांच्या घरी कोडग्यासारखं वावराव आणि निपचिप दहा च्या आत पडून घ्यावं आपलं. हे रोजचचं.
ही सध्याची आर्थिक कौटुंबिक परिस्थिती मुंबईत आलेलो असतानाच्या पहिल्या दिवसांपेक्षा सुस्थितीत आहे असं म्हणावं लागेल.त्या दिवसासारखं
अंगावर आईची साडी पांघरून झोपावं लागत नाही. मसाले भाताची चव मात्र आईचा हाताला तेंव्हासारखीच आहे.बदललं एवढंच की आता तो रोज रोज बळच पोटात ढकलावा लागत नाही. पहाटे पाच वाजता उठून बंदरावर(डॉक) जाणारं माझं आईबाप दहा वाजता घरी आल्यावर त्यांच्या कपड्यांच्या येणाऱ्या मासळीच्या वासाची इतकी सवय झालीये की तो आता इंपोर्टेड परफीयूंम सारखा वाटतो...तो नाही आला की पॉकेटमनी मागण्याच धाडस व्हायचं नाही,पॉकेटमनी म्हणजे तरी काय ओ सातवीपर्यंत रुपया मिळायचा  आणि मग आठवीला जंगी इन्क्रीमेंट झाली... चक्क रुपयाचे दोन रुपये झाले.आनंद गगनात मावेनासा होता.पण दोन रुपयांच्या कॉईनच्या रुपात तेव्हा तो मुठीत मात्र मावला होता.भाऊ सहा महिन्यांचा असतानापासूनच सकाळी पाच ते दहा म्हणजे पाच तास... सहा वर्षाच्या माझ्यावर त्याला सांभाळण्याची जबाबदारी.आई सकाळीच चहा बनवून एका थर्मास मध्ये ठेवायची.जेव्हा आम्ही उठू तेव्हा तो प्यायचा. त्यानंतर आईकडून चहा बनवायचं जे प्रशिक्षण घेतलं... आजही रोजचा सकाळचा चहा माझ्याच हातचा होतो.आई म्हणते तुझ्या हातचा चहा खुप मस्त लागतो.दगडू शांताराम परब सारख पॅपर पॅपर ओरडायची लाज वाटायची म्हणून लपत छपत दुकानावर जाऊन लाईन घायचो अन दिवस उगवायच्या आत पेपर टाकून घरी रिटर्न...घरच्यांना वाटायचं पोरगं गेलंय सकाळी सकाळी धावायला.तेव्हा एका महिन्याचे हजार रुपये मिळाले होते.माझी पहिली कमाई.शंभराच्या दहा नोटा दहादा मोजल्या असतील तेव्हा.
जबाबदारीचीच्या जाणिवेतून संवेदनशील मनाने मॅच्युरिटी नसलेल्या  मेंदूला भावनांच्या संगमात बुडवून अतिसंवेदनशीलपणाचा धडा दिला आणि मी मोठा झालो याची जाणीव झाली. कॅफे काय असतं माहीत नाही.माझ्यासाठी ते गर्भश्रीमंतांच टाईमपास करण्याचं ठिकाण.मागे मामाने पुण्यात एका हॉटेलात नेलं होतं.तिथली चमक डोळे चमकाऊन गेली.एन्ट्री पासून exit पर्यंत मान वर काढलीच नाही.समोर वावरत असलेल्या इसमांच्या गळ्यातला लोंबनारा टाय..माझ्यासाठी 'फासी का फंदा' टाईप च काहीतरी वाटत होतं.कुणिकडं आलो राव इथं...नुसत वाटायचं.त्यानंतर पुणे फक्त ट्रेन मधूनच पाहतो.
हापापलेल्या जीवांना रस्त्यावर पाहून त्यांच्यासाठी काहीही न करू शकणाऱ्या मला तेव्हा मात्र माझं आयुष्य परमोच्च असल्यासारखं वाटतं. तेव्हा एवढंच पुटपुटतो मनात...

श्रीमंतीच्या टोपल्यात
उरलेली भाकर अर्धी,
उपासमारीचीच्या पायरीवरला
तेवढ्याच साठी दर्दी...

स्टोरीवर दिसणाऱ्या चंद्रकोर लावलेल्या हसऱ्या चेहऱ्यामागे   
हळवं मन,स्ट्रगल,गरिबीची जाण या सगळ्या गोष्टी लपलेल्या असतात वर असतो तो फक्त मुखवटा.
✍️बा.ल ऋषि
इंस्टा/@gavran_tadka_official

कारगिल

जसे तू मला मी तुला सारखे पाहिजे,
जिद्दी आपण सैनिकां सारखे पाहिजे

मरतात लोक रोज त्या प्लॅस्टिकमध्ये,
कफन कसे.. तिरंग्या सारखे पाहिजे

जर गेलोच गावा मिळाली रजा तर,
एक सलाम सारखे सारखे पाहिजे

ते येतील तुझ्या रे अंगावर चालून,
बोट ट्रिगरवर तुझे सारखे पाहिजे

पाठीवर जगाच्या कैक होतील युद्ध,
पण विजय कारगिल सारखे पाहिजे !
.
✍️बा.ल ऋषि 
.
इंस्टा/@gavran_tadka_official

युट्युब vs टिकटॉक

कुठलंच प्लॅटफॉर्म चांगलं किंवा वाईट नसतं.वाईट असते ती त्यावर असलेली प्रवृत्ती.आणि चांगला असतो त्या प्लॅटफॉर्म चा योग्य वापर.चांगलं,वाईट च्या सो कॉल्ड आरोप प्रत्यारोपांचा नीट विचार केला असता.. येवढं नक्की लक्षात येत की आपण सगळे चुतीया आहोत.कुणीतरी काहीतरी व्हिडीओ पोस्ट केला.त्याला उत्तर म्हणून अजून कुणीतरी काहीतरी पोस्ट केलं.त्यावर चर्चांचे ग्रुप तयार झाले.असाच एखादा ग्रुप कोरोनाच्या संकटात सापडलेल्या गरजवंताना मदत मिळवून देण्यासाठी तयार झाला असता तर आंनद वाटला असता.दमलेल्या लहानश्या पावलांनी बॅग वर विक्षिप्त पडून केलेल्या प्रवासाच्या दृश्यांनी आमचं मन विचलित होत नाही. विनाकारण खर्च होत असलेला डेटा आणि अयोग्य ठिकाणी सळसळणार रक्त यांचा मिलाप योग्य ठिकाणी झाला असता तर कुणाचंतरी पोट भरल्याचा आंनद मिळाला असता.असो, एकाने शिव्या घातल्या दुसऱ्यानेही घातल्या.आया बहिणींचा उद्धार झाला.आपल्याला मजा आली.इथपर्यंत सगळं व्यवस्थित आणि नेहमीचंच.त्यामुळे शिव्यांवर भाष्य करून सभ्यतेचा जप मी नाही करत बसणार.पण कुणाला आणि कशाला महत्व द्यावं हे कळण्याइतपत तरी आपण सुज्ञ आहोत ही जाणीव नाहीशी झालीये.
चार दिवसांपासून सोशल माध्यमांत  सुरू असलेला निरर्थक दंगा, डिबेट्स.कोणी कोणाला कसे आणि किती अश्व लावले याच्या रेटिंग्स,सध्यस्थीतीबाबत नसलेलं गांभीर्य,नको त्या गोष्टींना दिलेलं प्रोत्साहन त्यात अजून चार लोकांच मत परिवर्तन,यू ट्यूब टिकटॉक ची थट्टा..आपल्याला काय झा#..?
.
सांजेसह विचार करत असताना आपण किती येड्या भोकाचे आहोत हे कळलं!(आपण म्हंटल मी)
.
✍️बा.ल ऋषि 

इंस्टा/gavran_tadka_official

अंतिम कविता

मुस्कटदाबी झाली अन
भांबावलेल्या मनाने
पानावर अविरत रेघोट्या मारण्यास सुरुवात केली
रक्त सांडत होतं,
जखमेसह कपाळावरल्या रेषांच मिलन होत होतं,
चेहरा विव्हळत होता.
अकस्मात मृत्यू येईल म्हणता म्हणता
आज स्वतःच स्वतःचा फास लटकावून ठेवला,
फासाच्या आधी ब्लिडिंगमुळेच मरणाने
आलिंगन द्यावं अन मोकळं करावं एकदाच, इतकंच..!
फक्त इतकंच...वाटत असताना
शाई संपली
बट्ट्याबोळ..
शोधाशोध सुरू झाली,
डोळ्यांवर अंधार आला
चाचपडू लागलो,
शोधू लागलो...पण !
पण.. शाई सुद्धा सोडून गेली होती मला, अर्ध्यावरच !
तिला कदाचित 'ती' भेटलेली असावी,
भेंचोद,आयच्या गावात,भोकात गेलं सगळं
"ब्लेड पानांन कुठं मेलो मी..?"
"फिस्कटल रे सगळं"
मंगटातल्या धमण्यांतून येणार रक्त
रिफिल मध्ये भरलं
आणि लिहिली रक्तभंबाळ झालेली,
सुटकेच्या निःश्वासास
भेटण्याची आर्त इच्छा असलेली
एक धगधगती रक्तरंजित अंतिम "कविता" !
.
✍️बा.ल ऋषि 

 insta@gavran_tadka_official

सोमवार, २० जुलै, २०२०

शब्दांची चोरी

भल्या पहाटे कुरतडले शब्द,
हात मारून काही चिरडले शब्द 

काना, मात्रा, वेलांटी तोडली,
भासवले असे की घडवले शब्द

चोरी गेल्या ओळी म्हणाल्या
बघ तुझे किती भरडले शब्द 

चांगल लिहितो म्हणत ते होते,
वाचले पुढ्यात मग नडले शब्द 

काय होता ओ दोष ओळींचा ?
माझेच मी आता खोडले शब्द 

कमेंट करून म्हणालो इतकंच
व्वा व्वा कमाल..आवडले शब्द !

✍️बा.ल ऋषि (gavran_tadka_official)

कुणास ठाऊक कसे लिहितो...

कुणास ठाऊक कसे लिहितो,
तिच्या ओठांचे ठसे लिहितो

जमत नाही लिहिण्या मला,
फार नाही जरासे लिहितो

श्वास घेतो अन श्वास सोडतो
काही रातीचे उसासे लिहितो

वेड्यासारखं करतो म्हणतात,
झालेले रोजचे हसे लिहितो

आटोळ्याला टांगलेला फास
अन ढिले पडले वासे लिहितो

प्रेम,विरह समतोल साधून
थोडे नकोसे,हवेसे लिहितो

वार करशील,ठार करशील
जन्मून जशाच तसे लिहितो

घोषणांचा जेव्हा बाजार उठतो,
त्यांचेच भरलेले खिसे लिहितो

रिकाम्या घागरीने हिंडणारे पाय
अन दुष्काळी कोरडे घसे लिहितो
.
✍️बा.ल ऋषि (gavran_tadka_official)